“कल्याण, तूं लग्न कर.”

“विश्वास, लग्न करून कुठं राहूं ? इथं पाहिलंस ना लोक कसे राहतात ? एकजण कुठं तरी नोकरी करतो व ठिणगींत काम करणा-या दोघां मित्रांना पोसतो. भाई लोक म्हणजे कमालीचा त्याग. कोणी चहाचे चार पेले घेऊनच दिवस मारून नेतात. कोणी विडीच्या धुरावरच मस्त राहतात. तर कोणी एक पानपट्टी चघळून उपासमार विसरतात. आपण कोणावर भार घालायचा, विश्वास ?”

“कल्याण, हजारोंचं होतं तसं तुझं होईल.”

“पाहूं. आतांच काय त्याचं ?”

“मग झोंप आतां.”

पुन्हां दोघे मित्र झोंपीं गेले. परंतु दुस-या दिवशीं आणखी धरपकड झाली, आणि तीत कल्याणहि पकडला गेला. तें भाषण त्याला भोंवलें. कामगारांत असंतोष पसरला. प्रचंड सभा होऊन “पगारवाढ न मिळाली तर अमक्या तारखेला संप पुकारूं” असा निर्णय घोषविण्यांत आला. संपसमिति स्थापली गेली. परंतु कामगारांना १२ ॥ टक्के पगारवाढ देण्याचें जाहीर झालें. संपूर्ण नाहीं, तर निदान निम्मी मागणी मिळाली. कामगारांचा जय झाला. ऐक्याची शक्ति त्यांच्या अनुभवाला आली. परंतु पुढारी अद्याप तुरुंगांतच होते. त्यांच्यावर खटले भरण्यांत आले. अनेकांना शिक्षा झाल्या कल्याणलाहि एक वर्षाची सक्तमजुरी मिळाली.

विश्वास मुंबई सोडून गेला. तो नगर जिल्ह्यांत एका कार्यकर्त्याबरोबर शेतक-यांत हिंडूंफिरूं लागला. मधून मधून तो पुण्यालाहि येई. विद्यार्थ्यांच्या संघटनेंतहि काम करी. परंतु कल्याणची त्याला आठवण येई. अभ्यास, प्रचार, संघटना तो करीत होता. परंतु त्या सर्व कार्यांत कल्याण नसल्यामुळें त्याला राम वाटेना.

आणि संध्या ? ती का रडत बसली असेल ? किती दिवस ती आशेवर अशी राहणार ? कल्याणनें तुरुंगांतून तिला पत्र लिहिलें असेल का ? विश्वासच्या मनांत संध्येला जाऊन भेटावें असें आलें. परंतु पैसे कोठून आणावयाचे ? त्यानें वा-याबरोबर तिला सहानुभूति पाठविली.

कल्याणनें तुरुंगांतून घरीं पहिलें पत्र लिहिलें. त्यानें तें रंगाला लिहिलें.

“प्रिय रंगास सप्रेम आशीर्वाद.

मी तुरुंगांत आहें. वर्ष लौकरच जाईल. आला दिवस जातो. हां हां म्हणतां दिवस जातील. रंगा, मी स्वत:ला लहान समजत होतों. परंतु २२। २३ वर्षांचा झालों. किती पटकन् मोठा झालों. रंगा, तुम्ही सारीं धीरानें राहा. बाबा नीट वागत असतील अशी आशा आहे. आईला म्हणावें काळजी नको करूं. मी येथें आनंदांत आहें. आणि संध्येकडे जा. तिला हें पत्र दाखव. पुढील पत्र तिला पाठवीन. तिला सांग कीं आशा सोडू नको:

मला तुमची सर्वांची आठवण येते. तूं पुण्याला येऊं म्हणत होतास. आतां सुटल्यावर पुढील बेत करूं. परंतु पुढें काय काय वाढलेलें आहे तें कोणाला ठाऊक ? येथें फारसा त्रास नाहीं. पूर्वीचे दिवस नाहींत. कामाचा तितकासा ससेमिरा नसतो. पुस्तकें वाचायला व वही लिहायला मिळाली आहे. मी कविता करीत बसतों. क्रांतीचीं गीतें. तुरुंगांत शरीर अडकते, परंतु मन अधिकच मुक्त होतें. तुरुंगांत प्रतिभेला नवपल्लव फुटतात. एका इंग्रज कवीनें म्हटले आहे कीं, “अत्यंत गोड गाणीं अत्यंत करुण व दु:खमय असतात.” मी म्हणतों कीं, “अत्यंत दु:खद असा जो तुरुंगवास तो थोर विचारांना व भावनांना जन्म देतो.” इंग्रजी भाषेंतील अमर पुस्तक “यात्रेकरूची यात्रा” तुरुंगांतच लिहिलें गेलें. थॉमस पेनचें “मानवी हक्क” तुरुंगांतच लिहिले गेलें. आणि लोकमान्याचें कर्तव्यस्फूर्ति देणारें “गीतारहस्य” तुरुंगांतच जन्मलें. मी असा महापुरुष नाहीं. परंतु माझीहि प्रतिभा-चिमणी भुरभुर उडत असते. संध्येला म्हणावें कल्याण पुन्हां कवि झाला आहे. अश्रु व हास्यें काव्यांत गुंफीत आहे. कामगारांचे अश्रुबिंदु व रक्तबिंदु शब्दांत गुंफीत आहे. आशानिराशांना पंख देत आहे. किसान-कामगारांचा तो कवि होत आहे. हें ऐकून संध्या हंसेल व आनंदेल. सर्वांना सप्रेम प्रणाम. गांवांतील मित्रांसहि.

तुझा,

कल्याण”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel