“उद्यां ग्रामोद्योग आणायचे कीं यंत्रोद्योग तें स्वराज्य आल्यावर ठरवूं. काँग्रेसनं राष्ट्रीय योजना-समिति नेमली आहे. ग्रामोद्योग नि यंत्रोद्योग यांचा समन्वयहि कदाचित् करावा लागेल. एखाद वेळेला वाटतं कीं लाखों खेडयापाडयांत हिंदुस्थान पसरलेला आहे तोच बरा. तें एक प्रकारं संरक्षण आहे. या विमानांच्या काळांत सात लाख खेडयांचीं सातशें शहरं कराल, तर परचक्र आलं म्हणजे कठीण जाईल. सात लाख खेडीं भस्म करणं कठीण आहे. सातशें शहरं ताबडतोब नष्ट करतां येतील. आपण खेडयांचींच गोकुळं करूं. कांहीं मोठे उद्योगधंदे ठेवावे लागतील. ते राष्ट्राच्या मालकीचे करूं. बाकी ग्रामीण धंदे ठेवूं. ते सुधारूं. त्यांच्यांत शोधबोध करूं. महात्माजींना चरख्यांत का शोध नको आहे ? त्यांनीं त्यासाठीं बक्षीसहि लावलं होतं. सर्व मानवांच्या बुध्दीचा, हृदयाचा विकास व्हावा असं मलाहि वाटतं. माझी काँग्रेस असलंच स्वराज्य आणूं पाहात आहे. नदी खालीं खालीं जात सागराला मिळते, त्याप्रमाणं काँग्रेस बहुजनसमाजाच्या सागराला येऊन मिळेल. या श्रध्देनं मी काँग्रेसच्या झेंडयाखालीं उभा राहात असतों. “

“आम्हीहि काँग्रेस मानतों.” कल्याण म्हणाला.

“तें खरं नाहीं. काँग्रेसला मोडण्यासाठीं तुम्ही काँग्रेसमध्यें आहांत. तुम्ही काँग्रेसची सदैव टिंगल करतां. तुम्ही अशी परिस्थिति मुद्दाम घडवून आणाल कीं काँग्रेस बदनाम होईल. काँग्रेसच्या मंत्रिमंडळाच्या काळीं इथं गोळीबार झाला. तुमचेच एक मोठे पुढारी त्या वेळीं खाजगी संभाषणांत म्हणाले, “काँग्रेसचे मंत्री होते म्हणूनच अगदीं सौम्य गोळीबार झाला.” परंतु तरीहि काँग्रेसनं कामगारांचं रक्त सांडलं असंच तुम्ही सांगणार. माझ्या जिल्ह्यांत गोळीबाराची वेळ येऊं नये म्हणून मीं माझे प्राण पणाला लावले. तुम्हांला तें आवडलं नाहीं. परंतु माझ्या डोळयांसमोर काँग्रेस होती. तिची प्रतिष्ठा राहावी ही माझी एकच इच्छा. आपल्या काँग्रेसचं मंत्रिमंडळ आहे. जरा मिळतं घेऊं, असं तुम्हांला वाटलं नाहीं. मागं काँग्रेसचे लाखों सभासद व्हावेत म्हणून मी तळमळत होतों, तर हा विश्वास म्हणाला, “निवडून येण्यापुरते करावेत. काँग्रेसची शक्ति नि प्रतिष्ठा आम्हीं काय म्हणून वाढवावी ?” तुम्ही खरे काँग्रेसचे नाहींत. माझ्यासारखे काँग्रेसजवळ भांडतील, परंतु तिची प्रतिष्ठा आम्ही कधीं कमी होऊं देणार नाही. काँग्रेसचे या राष्ट्रावर अपार उपकार आहेत. मोठमोठे लढे करून या राष्ट्रांत माणसं नांदतात असं तिनं जगाला पटवलं. नि:शस्त्र असलों, तरी आम्ही अन्याय सहन करणार नाहीं असं तिनं प्रत्यक्ष कृतीनं दाखवलं. काँग्रेसची शक्ति आपण वाढविली पाहिजे. परंतु तुमच्या मनांत तें नसतं. राष्ट्रीय शक्तीचा आपण वाढविली पाहिजे. परंतु तुमच्या मनांत तें नसतं. राष्ट्रीय शक्तींचा विचका व्हावा असं तुमचं ध्येय आहे. परंतु वसाहतींतील गुलाम देशांना आधीं परसत्तेपासून मुक्त व्हावं लागतं. त्यासाठीं राष्ट्रीय शक्ति एकत्रित करावी लागते. असं करतांना काँग्रेसला अनेकांशीं मिळतं घ्यायचा प्रयत्न करावा लागतो. यश न आलं तर ती शेवटीं एकटी लढायला उभी राहतेच. आणि मिळतं घेत असतांनाहि दरिद्री जनतेला ती विसरत नाहीं. कांहीं असो. मी तुमच्याकडे ओढला गेलों आहें तो तुमच्या सर्व गोष्टी मला पटतात म्हणून नव्हे. तुम्हीहि ध्येयवादी आहांत. तुम्ही निराश होऊं नये, एवढंच मला वाटतं. आणि तुम्हांलाहि धीर द्यावा, आधार द्यावा, प्रेम द्यावं असं वाटतं. कदाचित् वैयक्तिक प्रेमामुळंहि मी ओढला जात असेन. मी प्रेमाचा पुजारी आहें. प्रेमाचा कणकण गोळा करणारा भिकारी आहें; किंवा माझं प्रेम सर्वांना देत फिरणारा मी फकीर आहें. मला अमुक तत्त्वज्ञान नाहीं, अमुक पंथ नाहीं.”

भाईजींचा आवाज सकंप झाला. बाहेर पाऊस पडूं लागला.

“भाईजी, बाहेर पाऊस पडत आहे.” संध्या म्हणाली.

“पाऊस म्हणजे देवाची परम कृपा.” भाईजी म्हणाले.

“देवाची कसली कृपा ? पाण्याची वाफ होते, वर जाते, थंड होऊन पुन्हां पावसाच्या रूपानं खालीं येते. हा पदोपदीं देव कशाला ? हा देव मेल्याशिवाय मानवाची मान उंच होणार नाहीं. देवाधर्मांनीं मानवाला गुलाम केलं आहे.” विश्वास म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel