विश्वासचे वडील सांगत होते. ज्या वडिलांनीं त्याला घालविलें होतें, तेच त्याला व त्याच्या मित्रांना राहायला जागा द्यायला आज तयार झाले होते. स्वतंत्र राहा येथें येऊन असें म्हणत होते. प्रेमानें आश्वासनपर शब्द बोलून ते त्यांना धीर देत होते. मनुष्य कितीहि कठोर असला, दुष्ट असला, तरी केव्हां तरी त्याच्या हृदयांतील प्रेमाचे झरे वाहूं लागतात. त्याच्या जीवनाच्या वृक्षाला प्रेमाचे पल्लव, सहानुभूतीचीं फुलेंफळें एक दिवस आल्याशिवाय राहात नाहींत. कोणाच्या जीवनाच्या बागा लौकर बहरतात, कोणाच्या उशीरां; परंतु कोमल भावनांचा फुलोरा सर्वांच्या जीवनांत आल्याशिवाय राहणार नाहीं.

आणि आईबाप ! कितीहि कठोर ते झाले, तरी शेवटीं तेच कृपेची पाखर घालतील. सारें जग ज्या वेळीं आपणांस धिक्कारील, त्या वेळी आईबापच आपणांस जवळ करतील. आपण जगांत पदोपदीं अपमान गिळतों. अनेकांचीं बोलणीं सहन करतों. परंतु आईबापांजवळ आपला सारा स्वाभिमान आपण जणू दाखवीत असतों. सा-या जगासमोर नमूं, परंतु आईबापांजवळ ताठयानें वागूं. सा-या जगाजवळ भीक मागूं, परंतु आईबापांजवळ मागायला जाणार नाहीं.
कां बरें असें ? असें कां होतें ? एक तरी जागा स्वाभिमान दाखवायला असूं दे, असें का जिवाला वाटत असतें ? ज्यांचें प्रेम आहे त्यांच्याजवळच स्वाभिमान दाखवावा. दुनिया आपल्या स्वाभिमानाला थोडीच भीक घालणार आहे, असें का मनुष्याला वाटतें ?

वडिलांचे ते शब्द ऐकून विश्वास गहिंवरला, सद्गदित झाला.

कल्याण, विश्वास, रंगा सारे शेवटीं आपल्या खोलीवर आले. भाईजी एकटेच बसले होते. सारे मुके मुके होते. कोण काय बोलणार ?

“भाईजी, खरंच चांगलं होतं मूल.” कल्याण म्हणाला.

“श्वासोच्छ्वास सुरू व्हावा म्हणून सर्वांनीं किती खटपट केली. परंतु उपाय नव्हता.” विश्वासने सांगितलें.

“आज विश्वासचे वडील आम्हांला म्हणाले कीं नसेल पुण्यांत कुठं जागा मिळत तर इथं माझ्याकडे येऊन राहा.” रंगा म्हणाला.

“कांहीं प्रसंग असे असतात कीं ते सर्वांना मृदु बनवितात; सर्वांची माणुसकी त्या वेळीं जागी होते.” भाईजी म्हणाले.

“आपण सामान न्यायचं ना ? चला कीं.” कल्याण म्हणाला.

“चला.” विश्वास म्हणाला.

ते सारे सामान नेऊं लागले. त्या नवीन घरीं नेऊं लागले.

“इतक्या रात्रीं कशाला आणतां सामान ?” त्या मालकानें विचारलें.

“आमचं मनहि अस्वस्थ आहे. झोंप थोडीच येणार आहे. सामान वाहण्यानं भावना थोडया कमी होतील. दु:ख थोडं कमी होईल.” विश्वास म्हणाला.

इतरहि मित्र आले. भराभरा सामान चाललें. कल्याण सारें सामान भरीत होता. संध्येची ट्रंक त्यानें उघडली. तींत इतर सारे कपडे तो भरणार होता. तो ट्रंकेंत पाहूं लागला. कोंप-यांत ती देवाची मूर्ति होती. आणि एक खादीचें पातळ ! त्या वस्तु पाहून त्याला आश्चर्य वाटलें. परंतु ती देवाची मूर्ति त्याला माहीत होती. खादीचें पातळ कोठून आलें ? भाईजींनीं दिलें होतें का कधीं आणून ?

परंतु एक गाठोडें होतें त्या ट्रंकेत. कल्याणनें तें सोडलें. तों त्यांतून काय बाहेर पडलें ? चिमण्या. आशेच्या चिमण्या उडून गेल्या होत्या. चिंध्यांच्या निर्जीव चिमण्या तेथें समोर होत्या. एका चांदव्याला त्या चिमण्या शिवलेल्या होत्या, टांगलेल्या होत्या. आणि तीं सुंदर दुपटीं. आणि तीं आंगडींटोपडीं. अरेरे ! तें गांठोडें म्हणजे संध्येचें आशास्थान होतें. तिचीं सारीं स्वप्नें त्यांत सांठवून ठेवलेलीं होतीं. तिचें मंगल मातृत्व त्यांत सामावलेलें होतें. कल्याणच्या डोळयांतून पाणी घळघळूं लागलें. उद्यां संध्या घरीं आली व तिनें जर हें सारें पाहिलें, तर तिला काय वाटेल ? हीं दुपटीं, या चिमण्या, हीं आंगडींटोपडीं पाहून तिचें हृदय फाटेल. तिच्या हृदयाच्या चिंध्या होतील. त्या हृदयाच्या चिंध्या पुन्हां कोण शिवील ? तें भग्न विदीर्ण हृदय कोण शांतवील ? त्या हृदयांत पुन्हां कोण आनंद आणील, कोण तिथें पुन्हां आशेचीं पांखरें खेळवील ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel